
देवळी तालुका प्रतिनिधी
कुणाल चिचाटे
दिनांक 26 मे 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना युवा संघर्ष मोर्चाचे तहसीलदारामार्फत निवेदन,, शेतकरी नेते
किरण ठाकरे यांनी दिला आंदोलनाचा इशारा
देवळी- सध्या देवळी शहरातून ए.पी.एम.सी. समोरून जाणाऱ्या वर्धा-देवळी रोडचे काम सुरू आहे. हा मार्ग शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गावाच्या प्रवेशाचा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यालगत कृषी उत्पन्न बाजार समिती, एम.आय.डी.सी., ग्रामीण रुग्णालय, जिनिंग फॅक्टरी, खरेदी विक्री, मुलांचे वसतिगृह, विश्रामगृह, पेट्रोल पंप, तंत्रशिक्षण शाळा, महाविद्यालय आहे. याच मार्गावरील बाजार समितीत विदर्भातील प्रसिद्ध बैल बाजार सुद्धा भरतो. त्यामुळे या रोडवर शेतकरी-शेतमजूर, कामगार, विद्यार्थी व नागरिकांची नेहेमीच मोठी वर्दळ असते तसेच कापसाच्या हंगामात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस भरून येणाऱ्या विविध वाहनांची प्रचंड गर्दी असते. येणाऱ्या काळात ही वाहतूक प्रचंड वाढणार असून अपघाताचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.
सदर ठिकाणी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे रस्त्याचे काम सुरू होण्याआधीच दोन्ही बाजूंनी नाल्यांचे बांधकाम करण्यात आले होते. यामुळे रस्त्याची रुंदी अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना भविष्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
यापूर्वी युवा संघर्ष मोर्चा, पत्रकार बांधव व नागरिकांनी यासंदर्भात हरकत घेतल्यानंतर एका बाजूची नाली तोडण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूची नाली अद्यापही कायम आहे, ज्यामुळे रस्ता अपेक्षित प्रमाणात रुंद होऊ शकत नाही.
निवेदनातील प्रमुख मागण्या
1) रस्त्याच्या एका बाजूची शिल्लक असलेल्या नालीचे बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे.
2) रस्ता अधिकाधिक रुंद व प्रशस्त करण्यात यावा.
3) भविष्यातील वाहतूक व सुरक्षितता लक्षात घेता योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्यात यावी.
या मागण्या मान्य न झाल्यास किरण ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी अभिजित जिचकार, प्रोजेक्ट डायरेक्टर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी वर्धा यांना देण्यात आल्या आहे.
निवेदन देतेवेळी किरण ठाकरे यांचेसह प्रविण कात्रे, गौतम पोपटकर, ऍड.मंगेश घुंगरूड, संदीप दिघीकर, मनोज नागपुरे, नदीम शेख, गौरव खोपाळ, हारून तव्वर, प्रकाश बियाला, आत्मारामजी कांबळे, मनिष पेटकर, वृषभ गावंडे, प्रफुल दरणे व इतर अनेक नागरिक उपस्थित होते.